{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

जंगली रिव्ह्यू – हत्तीसुद्धा विद्युत जमवाल यांचा अतिशय वाईट ऍक्शनपटाला पायाखाली तुडवतील

Release Date: 29 Mar 2019 / Rated: U/A / 01hr 55min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Mayur Lookhar

अमेरिकन फिल्ममेकर चक रस्सेल यांचे हिंदी सिनेमात पदार्पण अतिशय निराशाजनक आहे.

मनुष्य आणि प्राण्यांमधले बंध स्क्रीनवर पाहायला सगळ्यांनाच आवडतो. पण आपल्याला ते आजकाल टीव्ही वर ऍनिमल प्लॅनेट सारख्या चॅनेल्स वर पाहायला मिळते. कधीकधी चित्रपटातसुद्धा हा अतूट बंध दाखवला आहे. टारझन आणि मोगली याचीच दोन उदाहरणे. पण सर्व प्रेक्षकांच्या कायमचा स्मरणात राहिलेला चित्रपट म्हणजे राजेश खन्ना यांचा हाथी मेरे साथी (१९७१).

२१व्या शतकात मात्र प्राण्यांचा उपयोग चित्रपटात फक्त विनोद घडवून आणण्यासाठी केला जातो. आता अमेरिकन दिग्दर्शक चक रस्सेल मनुष्य-प्राण्याचा अतूट बंध मोठ्या पडद्यावर पुन्हा आणणार आहेत.

जंगली मध्ये विद्युत जमवाल यांची भूमिका बिल्कुल टारझन शी मिळतीजुळती नाही. राज नायर (विद्युत जमवाल) मुंबईत प्राण्यांचा डॉक्टर आहे. त्याच्या आपल्या वडिलांबरोबर काही कटू आठवणी आहेत. त्याचे वडील चंद्रिकामध्ये हत्तीसाठी अभयारण्य चालवतात. राज आपल्या वडिलांशी बोलत नाही, परंतु आपल्या आईच्या १०व्या पुण्यतिथीला तो चंद्रिकाला पुन्हा येण्यासाठी तयार होतो.

आपल्या आईच्या १०व्या पुण्यतिथीला तो वडिलांशी असलेला आपला रुसवा दूर करतो. पण त्याच रात्री हस्तीदंत चोरण्यासाठी केशव (अतुल कुलकर्णी) आणि त्याची माणसे जंगलात घुसून हत्तीला मारून टाकतात.

हस्तीदंत चोरी हे आपल्या समोरचे एक भयानक सत्य आहे. आपल्या शेजारी राष्ट्र चीनकडून होत असलेल्या हस्तीदंताच्या मोठ्या मागणीमुळे भारतीय उपमहाद्वीपामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने हत्तींना मारले जाते. वीरप्पन सारख्या गुन्हेगारांना मारले तरी आजपण हत्तीची शिकार मोठ्याप्रमाणात केली जाते.

निर्माते जंगली पिक्चर्स आणि दिग्दर्शक चक रस्सेल यांनी विषय चांगला निवडला, परंतु तो मोठ्या पडद्यावर मांडण्यात मात्र ते फेल ठरले. अमेरिकन दिग्दर्शक चक रस्सेल यांनी या अगोदर अ नाईटमेर ऑन एल्म स्ट्रीट ३ – द ड्रीम वॉरिअर (१९८७) आणि जिम कॅरी यांची प्रमुख भूमिका असलेला सुपरहिरो चित्रपट द मास्क (१९९४) सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

आता ते जंगलीचे दिग्दर्शन का करताहेत या प्रश्नाचे उत्तर तेच देऊ शकतात. हत्तींच्या जागी माणसांना ठेवले तर हा एक टिपिकल बॉलिवूड रिव्हेंज ड्रामा चित्रपट आहे.

चित्रपटाची कथा आणि पटकथा अनेक जणांनी मिळून लिहली आहे. रोहन सिप्पी, चारुदत्त आचार्य, उमेश पडळकर आणि रितेश शाह यांनी मिळून चित्रपटाची कथा लिहली आहे तर चित्रपटाच्या कमजोर पटकथेचे श्रेय जाते ऍडम प्रिन्स ला.

राघव दर यांनी चित्रपटावर क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले असून पटकथे मध्ये सुद्धा त्यांना क्रेडिट दिले आहे. विद्युत जमवाल यांना सुद्धा फाइट कोरिओग्राफी मध्ये क्रेडिट दिले आहे. सगळे धागे उसवलेल्या चित्रपटाला बांधून ठेवण्याची जबाबदारी राघव दरवर होती तर रस्सेल वर कोणती जबाबदारी होती हा देखील प्रश्न पडतो.

चित्रपटाची पटकथा कमजोर असली तरी कलाकारांच्या चांगल्या अभिनयाने चित्रपट पाहण्यालायक तरी झाला असता, परंतु यात सुद्धा आपली घोर निराशा केली आहे. विद्युत जमवाल यांना सगळ्यात जास्त दोष द्यायला हवा. त्यांनी चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही.

प्राणी आणि प्राण्यांसाठी काम करणारे समाजसेवक यांच्यामध्ये एक स्पेशल बंध असतो. एकमेकांशी संवाद साधण्याची त्यांची एक वेगळी पद्धत असते, पण राज हत्तींशी ज्या पद्धतीने संवाद साधतो ते पाहून हसायलाच येते.

राज गाडीतून जात असताना काही हत्ती त्याचा रस्ता अडवतात. राज त्यांचे पाणावलेले डोळे पाहून त्यांच्याशी संवाद साधतो तेव्हा त्याला कळते हस्तिदंतासाठी त्यांच्यातल्या एका हत्तीला मारले आहे. तो त्यांची माफी मागतो आणि त्यांना रस्ता मोकळा करायला सांगतो आणि हत्ती त्यांच्या गाडीला जाऊ देतात. गमतीची गोष्ट म्हणजे तो त्यांच्याशी असा संवाद साधतो जणू काही ती माणसंच आहेत. हे फक्त बॉलिवूडमधेच होणं शक्य आहे.

राज हा दीपांकर नायर यांचा एकमेव मुलगा आहे परंतु तो दीदी आणि भोला या दोन हत्तींबरोबर लहानाचा मोठा झालाय. राज माहुतकडून हत्तींशी संवाद साधायला शिकतो. पण हत्ती आणि राजमध्ये चांगल्या केमिस्ट्रीचा अभाव आहे.

जंगली पिक्चर्स ने पूजा सावंत आणि आशा भट या २ नवीन चेहऱ्यांना या चित्रपटात संधी दिली आहे. सावंत ने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे तर आशा भट या मॉडेल असून पहिल्यांदाच चित्रपटात काम करत आहेत.

सावंत राज ची बालपणीची मैत्रीण आणि माहूतच्या भूमिकेत आहे. वाईट पटकथेमुळे त्यांना आपले अभिनयकौशल्य दाखवण्याची जास्त संधी मिळाली नसली तरी या चित्रपटात त्या एकमेव कलाकार आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे.

भट मीरा रे नावाच्या पत्रकाराच्या भूमिकेत आहेत. मीरा चंद्रिका मध्ये दीपंकर नायरचा इंटरव्यू घ्यायला आली आहे पण तिथे आल्यावर तिच्या हाती त्याहूनही खूप मोठी स्टोरी लागते. आपल्याला ना मीराची पत्रकारिता भावत ना आशाचा अभिनय.

नवखी अभिनेत्री म्हणून आपण एकवेळ याकडे दुर्लक्ष करू शकतो पण जमवाल आणि अतुल कुलकर्णी, अक्षय ओबेरॉय आणि मकरंद देशपांडे सारख्या अभिनेत्त्यांकडून ही अपेक्षा बिलकुल नव्हती.

देव (ओबेरॉय) हा राजचा बालपणीचा मित्र आता फॉरेस्ट ऑफिसर आहे. कथानक केरळ मध्ये घडत असले तरी दोघेही एकमेकाला भाई नावाने हाक मारतात. जमवाल आणि ओबेरॉय कडून मल्याळम अथवा मल्याळम लहेजातली हिंदी बोलणं जरी अपेक्षित नसलं तरी त्यांच्या टोन मध्ये अथवा शारीरिक हालचालींमध्ये सुद्धा कुठेही ते मल्याळी आहेत हे जाणवत नाही. अगदी छोट्या भूमिकेत ओबेरॉय यांना अक्षरशः वाया घालवलं आहे.

गजगूरु म्हणून देशपांडे मल्याळी लोकांचे दारूवर असलेले अतोनात प्रेम दाखवण्यात यशस्वी झाले असले तरी कलरीपायट्टु चे मास्टर म्हणून मात्र ते बिल्कुल शोभत नाहीत. एका सीनमध्ये राजला गोळी लागली आहे आणि त्याला गणपती दिसतात, नंतर त्याच्या लक्षात येते ते गणपती नसून गजगुरू आहे.

कुलकर्णी हस्तिदंत चोर केशवच्या भूमिकेत आहेत. केशवला पैशापेक्षा हत्तींची शिकार करताना जो आनंद मिळतो त्याच्यात जास्त रस आहे. पण त्याच वेळी त्याला मोठा हस्तिदंत असलेला हत्ती दिसला तर तो खुश देखील होतो.

केशव चे पात्र फारच विचित्र आणि कन्फ्यूजिंग आहे आणि कुलकर्णींचा अभिनय त्याला आणखी कन्फ्यूजिंग बनवतो.

साधी कथा, भरकटलेली पटकथा आणि कलाकारांचा वाईट अभिनय यामुळे हा चित्रपट हत्तीच्या पायदळी तुडवण्याच्या लायकीचा झालाय.

 

Related topics

You might also like